आणि बरंच काही- वैचारिक
आज भारताचा प्रजासत्ताक दिन. हा दिवस दिसण्यासाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी रक्ताचं पाणी केलं त्या सर्वांना आणि घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!🙏🏻
आजच्या दिवशी समाजमाध्यमांवर सगळेच तिरंग्यावर आपले प्रेम व्यक्त करताना दिसतात, पण खरं तर आजचा दिवस हा विश्वात तिरंग्याचा मान कसा वाढेल यासाठी चिंतन करण्याचा आहे.
दशकापूर्वी ‘भारत जागतिक महासत्ता होणार' चे वारे वाहू लागले होते. साधारण दहा वर्षांपूर्वी रविन्द्र नाट्य मंदिरात एक खासगी कार्यक्रम होता, त्यात अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव हे २०२० ला भारत जागतिक महासत्ता कसा होणार ते पोटतिडकीने सांगत होते. खूप कॉन्फिडेंस दिसला त्यांच्या आवेशात.
अजून भारत जागतिक महासत्ता तर दूर पण तो जो गवगवा झाला होता तोही मावळल्यासारखा वाटतो आहे.
मी काही अर्थतज्ञ नाही किंवा त्या विषयातला अभ्यासूही नाही, अगदी तळागाळातला सामान्य माणूस मी. जे मला दिसलं ते मांडण्याचा हा वैचारिक प्रयत्न.
भारत जागतिक महासत्ता होणार हा दावा एव्हाना निकालात निघाला आहे. तो पुन्हा कधी उचल खाईल तेव्हा खाईल, पण असं का झालं याचा कुणी विचार करताना दिसत नाही. भारत हा खरंच एक महान देश आहे. त्याला प्राचीन परंपरा आहे. कधीकाळी या नगरीत सोन्याचा धूर निघत होता असे म्हणतात. महान सम्राट, अवतार, तळपते सूर्य ह्याच मातीत जन्मले. महान ग्रंथ इथेच लिहिले गेले. म्हणजे हा देश कधीकाळी जागतिक महासत्ता होता हे नक्की.
आज ह्या देशाची अवस्था अशी का झाली? त्याला सर्वस्वी जबाबदार इथली जनता. ती इतकी स्वार्थी आहे की ती आधी स्वत:च्या भल्याचा विचार करते नंतर जमल्यास देशाचा. अपवाद आहेत.
आम्हाला आमच्याच भल्यासाठी उभारलेल्या रस्त्यांवरील सिग्नलव्यवस्था पाळायला लाज वाटते, ( शितावरून भाताची परीक्षा करतात तसंच सिग्नलच्या शिस्तीवरून तुम्ही त्या देशातल्या लोकांच्या मानसिकतेची परीक्षा करू शकता.), चिरीमिरी देऊन कुठलीही सरकारी कामं होतात हा विश्वास आमच्यात रूढ झालेला आहे, दादालोकांना आणि डझनभर गुन्हे नावावर असणार्या राजकारण्यांना समाजात विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे, जात आणि जीवनमार्गदर्शक धर्मव्यवस्थेत आम्ही इतके गुरफटून गेलोय की...
जगातल्या भ्रष्टाचारी देशांची यादी बनवणार्यांना भारत आठवावा लागत नाही. पाळणार्याला कडक कायदे आणि फाट्यावर मारणार्याला मोकळं अंगण आणि त्यामुळे सगळ्यांच्याच माथी आलेलं बकालपण.
सांगा बरं! कसा बुवा भारत जागतिक महासत्ता होणार?
आजच्या तरुण उच्चशिक्षित पिढीला भारत कधी सोडतो असे झालेले आहे. आणि एकदा का तो बाहेरच्या देशात गेला आणि तिथली सुव्यवस्था त्याने पाहिली की तो पुन्हा भारतात यायचं नावही घेत नाही.
सर्वोत्कृष्ट योध्दे, राजे, संस्कृती, अद्भूत नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या ह्या देशातील भूतकाळातल्या पानापानात भविष्यात एक सुंदर जग निर्माण करण्याची ताकद असताना ह्या देशाचा वर्तमानकाळ असा का...? लोकांचा देश, लोकांचा देश म्हणून सात दशके उलटली... काय तीर मारले लोकांनी? इंफ्रास्ट्रक्चरच्या नावाने कमालीची बोंब, जी कामं कधीच हातात घ्यायला हवी होती ती आज घेतली. भारतभरात ‘टक्केवारी' विषयाने वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने भरून निघतात तरी रस्ते डांबराविना रिकामे राहतात. म्हणजे भ्रष्टाचाराला कुठेतरी नैतिकतेच्या पंक्तीत बसवलंय की काय असं वाटावं अशी व्यवस्था. आणि म्हणे भारत महासत्ता होणार!
त्यासाठी लागेल दुर्दम्य इच्छाशक्ति... कठोर परिश्रम... जातीपातीच्या राजकारणाचा निपात... आधी देश मग मी ही पक्की संकल्पना... सामाजिक शिस्त...राजकारण्यांची निर्मळ लोकसेवावृत्ती... सगळी सुखं पायाशी लोळण घेतायत तरी ‘अजून पाहिजे' ची भूक सोडायची तयारी...योग्य मार्गाने संपत्तीनिर्माण... माझ्या चुकीच्या कृतीमुळे समाजातल्या इतरांना त्रास होणार नाही ही भावना...
आहेतयारी हे सगळं करायची...?
तर पाहूया स्वप्न नव्याने...!
भारत महासत्ता होण्याची.
चला त्यासाठी प्रतिज्ञा करूया! अधिक चांगले नागरिक बनूया! भारत बलशाली बनवूया!🙏
_विजय सावंत


Comments
Post a Comment