कविता- धन्य ती झाली खार

रामनवमी

    नमस्कार मंडळी 🙏🏻
   सर्वांना श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 

         ‘श्रीराम' हे हिंदू संस्कृतीचं केवळ दैवत नसून सबकुछ आहे. रामायणातील प्रत्येक घटना, प्रत्येक व्यक्तिरेखा; समाजात वावरताना कसं वागावं, कसं जगावं हे शिकवते. समाजात घडणारं कुठलंही सत्कार्य हे एकट्याचं काम नाही, त्यासाठी सर्वांनाच आपापल्या परीने हातभार लावावा लागतो. राम हे विजयाचं प्रतीक तर रावण हे पराजयाचं. चांगलं काम कोणतं आणि वाईट काम कोणतं हे सूर्यप्रकाशाइतकं लख्ख दिसत असतं. चांगल्या कामासाठी आपण आपला खारीचा वाटा उचलला तर रावण या प्रवृत्तीची हार ठरलेली. 

धन्य ती झाली खार

गाठण्या लंका रावणाची
झाली वानरसेना अधीर
दंड थोपटून उभे ठाकले
जय बजरंग बली समोर

लगबग ती मोठी चालली
उभारण्या सेतू सागरावर
होता जो तो लावित कुवत
आपला अनमोल हातभार

होते प्रभू रामचंद्र तिथे
जरा विसावले कातळावर
कसे सहज ध्यान ते जाता
त्या इवल्याश्या खारीवर

कळेना प्रभूंना हे कोणते
आहेत उपकार माझ्यावर
जीव तो इवलासा किती
करी वळवळ त्या सेतूवर

पुसता कौतुकाने जीवाला
मिळाले श्रीरामाला उत्तर
‘हा तर आहे सत्कार्याचा भार
उचलता वाटा, जीवनाचे सार'
झाले स्तंभीत सारे तिथले
कंठी दाटून आला गहिवर

ऐकता उत्तर त्या खारीचे
आला भरून प्रभूंचा ऊर
ठसा प्रेमाचा उमटला 
इवल्या मऊशार पाठीवर

धन्य धन्य ती झाली थोर
प्रभूंच्या हातातली खार
दिसतात तिच्या पाठीवर
बोटे आजही प्रभूंची चार

©विजय सावंत

फोटो सौजन्य- गूगल

Comments

  1. एकबाणी, एकवाणी, मर्यादा पुरुषोत्तम अशा विषेशणांचा अधिपती रामाशिवाय कल्पनाच येत नाही. आई-वडिलांच्या आज्ञांचे श्रद्धेने पालनकर्तानाच कोणताही पूर्वग्रह मनात न आणता चौदा वर्षे अतिव संघर्षाची व्यतीत केल्यानंतरही जनतेच्या मनातील किल्मिष दूर करण्यासाठी जिवलग पत्नी, मुलें ह्यांच्या त्यागाचे अत्युच्च उदाहरण देणारा याउप्पर नैराश्य शरयू नदीत आत्महत्या करणारा राजा आपल्यातील वाटतो. आणि म्हणूनच जनतेने त्यास देवत्व दिले.🙏

    ReplyDelete
  2. जय श्रीराम

    ReplyDelete
  3. तुमच्या कवितेने खारुताई धन्य पावली असेल.मर्यादा पुरुषोत्तम प्रभु राम की जय!

    ReplyDelete

Post a Comment